चालू घडामोडी : १७ जानेवारी २०१८
निवडणुकीतील उमेदवारांना उत्पन्नाचा स्रोत जाहीर करणे बंधनकारक :
- आजवर निवडणुकीचा अर्ज भरताना उमेदवारांना त्यांचे उत्पन्न जाहीर करावे लागत होते. मात्र आता तेवढय़ाने भागणार नाही.
- उमेदवारांना त्या उत्पन्नाचा स्रोतही जाहीर करावा लागेल, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. अनेक राज्यांत नजीकच्या भविष्यात होणाऱ्या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर या निर्णयाला महत्त्व आहे.
- तशा स्वरूपाची मागणी करणारी याचिका लोक प्रहरी या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने तिचे सरचिटणीस एस.एन. शुक्ला यांनी दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने 16 फेब्रुवारी हा निकाल दिला. त्यामुळे आता उमेदवारांना उत्पन्नाचा स्रोतही जाहीर करणे बंधनकारक ठरणार आहे. नव्या उमेदवारी अर्जामध्ये त्यासाठी वेगळा रकाना असेल.
रेल्वेत आरक्षित आसनासाठी प्लॅटफॉर्मवर डिजिटल स्क्रीन :
- रेल्वे प्रवासासाठी आपले आसन आरक्षित केल्यानंतर प्रवाशांना संबंधीत रेल्वेच्या डब्याबाहेर दाराजवळ कागदावर प्रिंट काढून चिकटवलेला तक्ता पहावा लागते. मात्र, असा कागदाचा तक्ता चिकटवणे यापुढे बंद होणार असून त्याऐवजी रेल्वे स्थानकातील ज्या प्लॅटफॉर्मवर रेल्वेचे आगमन होणार असेल त्या प्लॅटफॉर्मवर डिजिटल डिस्प्लेद्वारे हा तक्ता प्रसिद्ध केला जाणार आहे.
- रेल्वेकडून राबवण्यात येणारी ही प्रायोगिक योजना असून सुरुवातीला ती सहा महिन्यांसाठी राबवण्यात येणार आहे. येत्या 1 मार्च 2018 या तारखेपासून हा नवा बदल करण्याच्या सूचना रेल्वे मंत्रालयाने आपल्या संबंधीत विभागीय कार्यालयांना दिल्या आहेत. देशभरातील A1, A आणि B दर्जाच्या रेल्वेस्थानकांवरच हा प्रयोग केला जाणार आहे.
नवउद्योजकांना अरब देशांमध्ये संधी मिळणार :
- संयुक्त अरब अमिरातीसह जॉर्डन, इराक, इजिप्त, बहारीन, कतार असे एकूण बावीस अरब देश आणि भारतामध्ये उद्योग-व्यवसायाच्या संधी शोधणे आणि त्याचा फायदा उद्योजकांना मिळवून देण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत.
- अरब देशांमध्ये पुनर्विकास व पुनर्बांधणीची अनेक कामे भारतीय कंपन्या करत आहेत. परदेशातून कामानिमित्त अरब देशांमध्ये स्थायिक झालेल्यांपैकी सर्वाधिक 'एक्सपॅट' नागरिक हे भारतीय आहेत.
- त्यांच्याकडे खूप आदराने पाहिले जाते. या भारतीयांना अडचणीच्या काळात, विशेषतः युद्धसदृश परिस्थितीत मदत करण्यासाठी चेंबर प्रयत्नशील आहे.
- तसेच दूतावासामध्ये अनुभवायला मिळणारा लालफितीचा कारभार चेंबरच्या कार्यप्रणालीत दिसत नाही. त्यामुळे अरब देशातील भारतीय नागरिकांची काळजी घेणे आणि भारतासह संबंधित अरब देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी चेंबरतर्फे सर्व उपक्रम राबविले जातात.
एप्रिलमध्ये होणार चांद्रयान-2 चे प्रक्षेपण :
- भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्रो) चांद्रयान-2 या भारताच्या महत्त्वाकांक्षी यानाचे एप्रिल महिन्यात प्रक्षेपण होईल, अशी माहिती अंतराळ विभागाचे प्रमुख जितेंद्र सिंग यांनी दिली.
- भारताची ही दुसरी चांद्रमोहीम असून त्याला 800 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. आजवर फारसे संशोधन न झालेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवाकडील प्रदेशात ते उतरवण्याचे उद्दिष्ट असल्याचे इस्रोचे नवनियुक्त अध्यक्ष के. सिवन यांनी सांगितले.
- चांद्रयान-1 ने चंद्रावरील पाण्याचा सोध लावला होता. दुसरी मोहीम त्यापुढील संशोधनाच्या उद्देशाने आखली आहे. चांद्रयान-2 च्या प्रक्षेपणासाठी एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान योग्य कालावधी आहे. एप्रिलमधील प्रक्षेपण यशस्वी झाले नाही तर नोव्हेंबरमध्ये पुन्हा प्रयत्न केला जाईल, असे सिवन म्हणाले.
- चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणे खूप कठीण काम आहे. त्या भागात लाखो वर्षांपूर्वी तयार झालेले खडक आहेत. त्यांच्या नमुन्यांच्या अभ्यासातून विश्वाच्या उत्पत्तीचे रहस्य उकलण्यास मदत होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.
थारच्या वाळवंटात रंगणार 'रागस्थान' महोत्सव :
- जगाच्या कानाकोपऱ्यातून हजारो किलोमीटरचा रस्ता कापून येणाऱ्या सर्जनशील कलावंतांना तसेच कलेची उत्तम जाण असणाऱ्या रसिकांना एकाच व्यासपीठावर एकत्र येता यावे, आणि कलेची देवाणघेवाण व्हावी, या हेतून सुरू झालेला 'राग'स्थान' महोत्सव यंदा थारच्या वाळवंटात रंगणार आहे.
- 23 ते 25 फेब्रुवारीदरम्यान राजस्थानच्या जैसलमेर येथे आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात 40 हून अधिक देशांतील हजारो कलावंत सहभागी होणार आहेत.
- दर्जेदार संगीताचा सर्वोत्तम अनुभव रसिकांपर्यंत पोहोचवावा हा महोत्सवाचा मुख्य हेतू आहे. यंदा महोत्सवात कलावंतांना आपली कला सादर करता यावी, यासाठी मोरियो (मोर), बिराखा (पाऊस) आणि अम्मारा (तारा) असे तीन भव्य व्यासपीठ उभारण्यात येणार आहेत. याशिवाय 40 हून अधिक लाइव्ह कला प्रकार सादर केले जाणार आहेत.
- मुंबई, दिल्ली, पुणे, अहमदाबाद अशा शहरांतून सहभागी होणाऱ्या रसिकांची सशुल्क प्रवासाची सोय करण्यात येणार आहे.
दिनविशेष :
- आय.बी.एम. चे अध्यक्ष थॉमस वॉटसन यांचा जन्म सन 1874 मध्ये 17फेब्रुवारी रोजी झाला.
- रणदुंदुभि नाटकाचा पहिला प्रयोग सन 1927 मध्ये 17 फेब्रुवारी रोजी झाला.
- एनव्हीडिया चे सहसंस्थाक 'जेन-ह्सून हुआंग' यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1963 रोजी झाला.
- 17 फेब्रुवारी 1986 हा दिवस भारतीय तत्त्वज्ञ जे. कृष्णमूर्ती यांचा स्मृतीदिन आहे.
