चालू घडामोडी : २० डिसेंबर २०१७

जगातील स्थलांतरितांत भारत प्रथम :
  • 📌 परदेशातील स्थलांतरितांच्या संख्येत भारत पहिल्या क्रमांकावर असून एकूण 1.7 कोटी भारतीय लोक परदेशात वास्तव्य करीत आहेत. त्यातील पन्नास लाख लोकांचे सध्याचे वास्तव्य आखातात आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटले आहे.
  • 📌 मेक्सिको, रशिया, चीन, बांगलादेश, सीरिया, पाकिस्तान, युक्रेन या देशांचे लोक त्या खालोखाल मोठय़ा प्रमाणात स्थलांतरित म्हणून परदेशात आहेत. त्यांची संख्या 0.6 ते 1.1 कोटी आहे, असे 2017 च्या आंतरराष्ट्रीय स्थलांतर अहवालात म्हटले आहे. भारताखालोखाल मेक्सिकोचे 1.3 कोटी लोक परदेशात स्थलांतरित म्हणून राहात आहेत.
  • 📌 रशियाचे 1.1 कोटी, चीनचे 1 कोटी, बांगलादेशचे 0.7 कोटी, सीरियाचे 0.7 कोटी, पाकिस्तान व युक्रेनचे प्रत्येकी 0.6 कोटी लोक परदेशात स्थलांतरित म्हणून वास्तव्यास आहेत.
  • 📌 सध्या जगात 2.58 कोटी लोक त्यांचा जन्मदेश सोडून परदेशात राहात आहेत. त्यांचे प्रमाण इ.स. 2000 पासून 49 टक्के वाढले आहे.

रायगड प्राधिकरण अध्यक्षपदी संभाजीराजे छत्रपती :
  • 📌 किल्ले रायगड प्राधिकरणाची घोषणा करण्यात आली. प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची निवड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
  • 📌 शिवछत्रपतींच्या स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगडच्या संवर्धनासाठी शासनातर्फे रायगड विकास प्राधिकरण स्थापन केले आहे. रायगड संवर्धन जगातील दुर्ग अभ्यासकांसाठी आदर्श ठरावा व त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
  • 📌 खासदार संभाजीराजे यांनी 6 जूनला दुर्गराज रायगडावर शिवछत्रपतींचा शिवराज्याभिषेक सोहळा भव्य प्रमाणात साजरा करणे सुरू केले. हा सोहळा पुढे लोकोत्सव बनला. खासदार संभाजीराजे यांनी रायगडचे जतन व संवर्धन करण्याची मागणी सरकारकडे केली होती. रायगडावर 2016च्या शिवराज्याभिषेक सोहळ्यावेळी मुख्यमंत्र्यांनी रायगड संवर्धनासाठी 600 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली होती.

केंद्रा सरकारने साखर साठ्यावरील निर्बंध उठवले :
  • 📌 यंदाच्या हंगामात देशांतर्गत साखर उत्पादन अपेक्षेपेक्षा जादा होणार असल्याने व साखरेचे दर कोसळल्याने केंद्र सरकारने व्यापारी व उद्योगांवर घातलेले साखर साठ्याचे निर्बंध उठवले. या निर्णयाचा तातडीने परिणाम साखरेच्या दरावर होणार नाही. हाच निर्णय हंगामाच्या सुरुवातीला घेतला असता, तर साखरेचे दर स्थिर राहण्यास मदत झाली असती. उशिरा सुचललेल्या या शहाणपणाचे परिणाम हंगामाच्या शेवटी दिसणार आहेत.
  • 📌 गेल्यावर्षी साखरेचे उत्पादन फारच कमी झाले. याचा फायदा घेऊन साखर व्यापारी व उद्योगांकडून साखरेचा अतिरिक्त साठा केला जाण्याची शक्‍यता होती. हे टाळण्यासाठी साखर व्यापाऱ्यांना पाच हजार क्विंटल तर मेवा-मिठाई, शितपेये आदी तयार करणाऱ्या उद्योगांना दहा हजार क्विंटलच साखर साठा करण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाने आवश्‍यक असेल तेवढीच साखर व्यापारी व उद्योगांकडून खरेदी केली. गेल्यावर्षी त्याचा परिणाम चांगला झाला, यामुळे साखर साठा झाला नाही.

जेरुसलेमप्रकरणी राष्ट्रसंघात अमेरिका एकाकी :
  • 📌 जेरुसलेम शहराला इस्राईलची राजधानी म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली मान्यता मागे घेण्याची मागणी करणाऱ्या ठरावाला अमेरिका वगळता संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीमधील इतर सर्व 14 सदस्यांनी पाठिंबा दिला आहे. अमेरिकेने या ठरावासाठी व्हेटो अधिकाराचा वापर केला आहे.
  • 📌 जेरुसलेमवरील इस्राईलच्या हक्काबाबत जागतिक पातळीवर वाद असताना अमेरिकेने काही दिवसांपूर्वी जेरुसलेम इस्राईलची राजधानी म्हणून मान्य असल्याची एकतर्फी घोषणा केली होती. यामुळे अरब देशांनी संतप्त प्रतिक्रिया दिली होती, तर इतर अनेक देशांनीही या घोषणेला विरोध केला होता. याचे पडसाद सुरक्षा समितीमध्येही पडले.
  • 📌 इजिप्तने मांडलेल्या ठरावामध्ये अमेरिकेचे नाव न घेता त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. जेरुसलेमचा दर्जा केवळ इस्राईल आणि पॅलेस्टाइन यांच्यामधील थेट चर्चेनंतरच निश्‍चित व्हावा, या 1967 मधील ठरावाप्रमाणेच इतर देशांनी वागले पाहिजे, असे मत ब्रिटन आणि फ्रान्स यांनी मांडले.

मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचा राजीनामा :
  • 📌 हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी 19 डिसेंबर रोजी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे राजीनामा दिला. राज्यपालांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून, नव्या सरकार स्थापनेच्या घडामोडींना आता वेग येणार आहे.
  • 📌 नवे सरकार स्थापन होईपर्यंत सिंह आणि त्यांचे मंत्रिमंडळ काळजीवाहू म्हणून कार्यरत राहील. विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांविरोधी लाट आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून वीरभद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली लढत असलेल्या कॉँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला.
  • 📌 68 जणांच्या विधानसभेत कॉँग्रेसला जेमतेम 21 जागा मिळाल्या. भाजपने 44 जागा जिंकत जोरदार मुसंडी मारली. माकपला एक, तर दोन अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.
  • 📌 हिमाचल प्रदेशातील शाही कुटुंबात जन्मलेले वीरभद्र सिंह 83 वर्षांचे असून, त्यांनी अर्की विधानसभा मतदारसंघातून 6 हजार 51 मतांच्या फरकाने विजय मिळविला आहे. त्यांनी भाजप उमेदवार रतनसिंह पाल यांना पराभूत केले.
दिनविशेष :
  • 📌 रशियात 20 डिसेंबर 1917 रोजी पहिल्या गुप्त पोलिस संस्थेची (चेका) स्थापना झाली.
  • 📌 20 डिसेंबर 1933 हा दिवस संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक 'विष्णू वामन बापट' यांचा स्मृतीदिन आहे.
  • 📌 पद्मश्री भरतनाट्यम व कथ्थक नर्तिका 'यामिनी कृष्णमूर्ती' यांचा जन्म 20डिसेंबर 1940 रोजी झाला.
  • 📌 सन 1945 मध्ये 20 डिसेंबर रोजी मुंबई-बंगलोर प्रवासी विमानसेवा सुरू झाली.


Archive

Contact Form

Send